केंद्रसरकार महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देत असल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप

October 19,2020

सांगली : १९ ऑक्टोबर - महाराष्ट्राला मदत करण्यामध्ये केंद्र सरकार दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी व मदतीसाठी केंद्राने तातडीने एनडीआरएफ पथक पाठवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पत्राद्वारे केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर शेतकर्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

राज्यातील अतवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या बाबतीत राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात यंदा अतवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास ५0 हजार कोटी इतके शेतीचे नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर आता शेतकर्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ७५ व २५ टक्के तातडीने मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना मदत केली पाहिजे. राज्यात शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करून मदत देण्यासाठी केंद्राने एनडीआरएफ पथके पाठवायला हवी, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

तसेच आज जागतिक तापमान वाढीचा फटका जगातील शेतीला बसत आहे, केवळ २-३ देशाच्या चुकीमुळे संपूर्ण जगाला वैश्विक तापमान वाढीचा परिणाम सोसावा लागत आहे. त्यामुळे जगात फिरणार्या आपल्या पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावर आवाज उठवला पाहिजे. तसेच जागतिक आपत्ती निवारण कोष स्थापन करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त करत बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर आल्यावर त्याठिकाणी केंद्र सरकारने तातडीने मदत केली. मात्र, महाराष्ट्रात एवढं मोठे नुकसान झाले आहे, पण अद्याप मदतीची भूमिका घेतली नाही. त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका पक्षपातीपणाची असून महाराष्ट्राबाबत सापत्नीक व दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी राज्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाहणी करत भरीव मदतीची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.