अखेर मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर निघाले, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मदतकार्याला सुरुवात
October 19,2020सोलापूर : १९ ऑक्टोबर - राज्यावर अस्मानी संकट कोसळले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही अशी टीका विरोधकांनी केली होती. पण, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून तातडीने मदतकार्य करण्यास सुरुवातही केली आहे.
नुकसानग्रस्तांना धीर देत मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांची प्रातिनिधिक मदत दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यादरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
मुख्यमंत्र्यांचे सांगवी खूर्द येथे आगमन झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. या भागात 150 घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून 11 धनादेशांचे वाटप केले आहे. पडझड झालेल्या प्रत्येक घराला 95 हजारांची मदत देण्यात आली आहे.
अक्कलकोट, बोरी नदी, रामपूर, बोरी उमरगे या पूरग्रस्त भागांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसभर पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसेच नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ आवश्यक ते पंचनामे कागदपत्रांच्या फारशी शहानिशा न करता पूर्ण करण्याचे आदेश आधीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा पूरग्रस्त भागांचा दौरा पुर्ण केल्यावर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.