राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागतो - देवेंद्र फडणवीस

October 19,2020

बारामती: १९ ऑक्टोबर -  'अनेक बाबतीत राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. त्याविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळं शरद पवारांना सरकारचा बचाव करावा लागतो. तेवढं एकच काम आता त्यांच्याकडं आहे,' असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज हाणला. 

फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पाहणीला सुरुवात केली. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतीच्या प्रश्नांसोबतच राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. करोनाच्या काळात घरात बसून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं पवारांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री मुंबईत थांबून राज्यभराचा आढावा घेत असतात. आम्हीही त्यांना माहिती देत असतो, असं पवार म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी पवारांना टोला हाणला. राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचं व सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम पवार साहेबांकडे आहे,' असं फडणवीस म्हणाले.

पवारांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. 'राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलण्याची ही वेळ नाही. तुमचे जे काही मतभेद आहेत, ते चालत राहतील. यापूर्वीही मतभेद झालेले आहेत. आम्हीही पाहिलंय. राज्यपाल व सरकार एकाच पक्षाचे असतानाही मतभेद झालेले आहेत. मात्र, आता तो विषय नाही. शेतकऱ्यांना काय मदत द्यायची हे महत्त्वाचं आहे,' असं ते म्हणाले. शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते. केंद्राची मदत कशी मिळते हे त्यांना माहीत आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो, गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसून त्यानुसार मदतीची भूमिका निश्चित करतात. असं असताना केंद्राकडे बोट का? शेतकऱ्यांना ही टोलवाटोलवी नको आहे, असंही फडणवीस म्हणाले.

'अतिवृष्टी, पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱयांना भरीव मदत करण्याची गरज आहे. केंद्राकडून मदत मिळविण्याचा आम्ही सर्व तो प्रयत्न करू. परंतु राज्यानेही भरीव मदत करणे गरजेचे आहे. आम्ही दौरे जाहीर करताच राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. आम्हाला प्रत्येक शेतकर्यांच्या बांधावर जाणे जमणार नसले तरी शक्य आहे तेवढ्या व्यथा जाणून घेऊ. नुकसानीसाठी मोबाईलमध्ये काढलेला फोटो ग्राह्य धरत प्रत्येकाला मदत मिळेल, यासाठी आम्ही आग्रही राहू. प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे राहायच, आपल जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही, अशी जोरदार टीकाही फडणवीस यांनी केली. 'राज्याला राज्याची जबाबदारी घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही मदत घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतजमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. रब्बी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्यांना त्या कामासाठी एक हिस्सा का होईना राज्य शासनाने तातडीने मदत केली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत अडकू नये,' असंही ते म्हणाले.