गडचिरोलीत जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलिसांचे गृहमंत्र्यांनी केले अभिनंदन

October 19,2020

नागपूर : १९ ऑक्टोबर - गडचिरोली पोलिसांना पाच जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या यशस्वी कारवाई बद्दल त्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक आणि जवानांचे अभिनंदन केले आहे. रविवारी गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत जवानांनी ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते.

गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली येथील नक्षल मूव्हमेंट कमजोर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यातच रविवारी कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षल आणि सी-६० पथकात चकमक झाली. ज्यामध्ये ५ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन पुरुष, तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सी-६० चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित होते. त्यावळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. 

प्रत्युत्तरात सी-६० जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. या कारवाई नंतर गडचिरोली पोलिसांचे कौतुक होत आहे. यावर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन केले. भविष्यात या पुढे देखील गडचिरोली पोलिसांकडून अशाच कारवाईची अपेक्षा असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.