न्यायाधीशांनी आपल्या तत्वांवर ठाम राहायला हवे- न्यायमूर्ती एन. व्ही. रमण
October 20,2020नवी दिल्ली : २० ऑक्टोबर - जनतेचा विश्वास हीच न्यायपालिकेची सर्वात मोठी शक्ती आहे. निष्ठा, विश्वास आणि स्वीयकारार्हता ही कमवावी लागते. त्यामुळे न्यायाधीशांनी आपल्या तत्वांवर ठाम राहायला हवे. दबाव आणि प्रतिकूलता असतानाही निर्भीडपणे निकाल दिले पाहिजेत. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी केले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रक्कि यांनी नुकतेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिण्याचे अभूतपूर्व पाऊल उचलून न्या. रमण यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर न्या. रमण यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य केले आहे. या पृष्ठभूमीवर न्या. रमण यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. आर. लक्ष्मणन यांच्या श्रद्धांजली सभेत न्या. रमण बोलत होते.
न्या. लक्ष्मणन यांचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांचे स्मरण करताना न्या. रमण म्हणाले, आपल्या सर्वांना त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आजच्या काळात याची सर्वाधिक गरज आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी न्यायमूर्ती शरद बोबडे यांना पत्र लिहून आरोप केला होता की आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा वापर करून आपले लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा तसेच उलथून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश हे तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्ती आहेत. आणि माजी न्यायाधीशांनी हे वास्तव मांडले आहे, असे रेड्डी यांनी लिहिले होते.