ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे - सुनील केदार

October 20,2020

नागपूर : २० ऑक्टोबर - अवकाळी पावसामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा एक हात म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अन्य लाभार्थ्यांना नागपूर जिल्हा परिषदेमार्फत जोडधंदा म्हणून कुक्कुट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी व लहान शेतकरी, शेतमजूर, दारिद्रय रेषेखालील लाभार्थी व निराधार महिलांना प्राधान्य देत आर्थिक वर्ष २०२०-२१ या काळात तलंगट (२५+३) व ८ ते १० आठवड्याचे कुक्कुट पोल्ट्री केजेससह वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. हा कार्यक्रम नागपूर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्वसाधारण गटातील व आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येईल. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतीसोबत जोडधंदा म्हणून उपयोगात आणावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालन मंत्री सुनील केदार यांनी केले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था या व्यवसायामुळे उंचावण्यास मदतच होईल व तरुणवर्गाच्या हाताला रोजगाराची संधी प्राप्त होईल, असेही ते यावेळी म्हणाले .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किंवा नागपूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात ०७१२-२५६०१५० या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रथम चरणात जिल्ह्यातील २५०० लाभार्थ्यांना कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम निर्धारित केला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर आहे. संबधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले आहे.