विधानपरिषद निवडणुकांचे मतदान होईपर्यंत नामनिर्देशित सदस्यांच्या नावांची घोषणा करू नका - पत्रकाराने केली मागणी

November 22,2020

नागपूर : २२ नोव्हेंबर - महाराष्ट्रात ६ मतदार संघांमध्ये विधानपरिषदेच्या निवडणूका  असताना विधानपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांकडून घोषित केली जाणे हा आचारसंहिता भंग ठरू शकतो त्यामुळे या निवडणुकांचे मतदान होईपर्यंत या  नेमणुकांची घोषणा केली जाऊ नये अशी मागणी नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अविनाश पाठक यांनी केली आहे. 

पाठक यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंहजी  कोश्यारी आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त युपीएस मदान या चौघांनाही यासंदर्भात इ-मेलद्वारे पत्र  पाठवले आहे. महाराष्ट्रात नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ, पुणे विभाग पदवीधर मतदार संघ, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ आणि धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ  या मतदार संघात विधानपरिषद सदस्य निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून १ डिसेम्बर २०२० रोजी या सर्व मतदार संघात मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील घटनेच्या १७१/५ कलमान्वये राज्यपालांतर्फे नेमल्या जाणाऱ्या १२ सदस्यांच्या जागा १५ जून २०२० रोजी रिक्त झाल्या आहेत. या जागा भरण्याची प्रक्रिया आतापर्यंत झाली नव्हती मात्र, वरील सहा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यावर ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यमंत्रिमंडळातील  प्रतिनिधींनी या १२ जागांवर नेमण्यासाठी नावे  निश्चित करून राज्यपालांकडे सोपवली आहेत. याबाबत  १५ दिवसात निर्णय घ्यावा अशी विनंतीही राज्यपाल महोदयांना केली असल्याची माहिती आहे. 

१ डिसेम्बर रोजी मतदान होणार असलेल्या क्षेत्रात राज्याचे २० पेक्षा अधिक जिल्हे समाविष्ट आहेत, अशा वेळी राज्यातील महाआघाडी सरकारने  विधानपरिषद सदस्यांची नावे  निश्चित करून ती राज्यपालांनी नियुक्तीची घोषणा करायची हा या सहा मतदारसंघातील मतदारांवर  प्रभाव टाकण्याचा प्रकार ठरू शकतो याकडे पाठक यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे.  हा प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरू शकेल अशी भीतीही त्यांनी या पत्रांमध्ये व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नेमणूका  करण्यापासून  प्रतिबंधित करण्यात यावे  अशी मागणी अविनाश पाठक  यांनी आपल्या पत्रांद्वारे सर्व संबंधितांना केली आहे. या चारही पत्रांच्या प्रति महाराष्ट्रातील  विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.