भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न होतो आहे - ममता बॅनर्जींचा आरोप

November 26,2020

कोलकाता : २६ नोव्हेंबर - पश्चिम बंगालमध्ये येत्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपनं या निवडणुकीची तयारी आधीपासूनच सुरू केलीय. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला पछाडण्यासाठी हरएक पद्धतीचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. 

 ममता बॅनर्जी बांकुडामध्ये एका रॅलीसाठी उपस्थित झाल्या होत्या. त्यावेळी, त्यांनी भाजपला आव्हानही दिलंय. 'हिंमत असेल तर भाजनं मला अटक करून दाखवावी, मी निवडणुकीत तुरुंगातूनही तृणमूल काँग्रेसला विजयी करून दाखवेन' असं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय. 

तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून पैशांची लालूच दाखवली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. भाजप हा देशासाठी सर्वात मोठा अभिशाप असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. 

यापूर्वी सोमवारी, ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला बांकुराच्या चतुरडीह गावात एका आदिवासी आणि दलित कुटुंबासोबत भोजन करणाऱ्या अमित शहांनी हे केवळ कॅमेऱ्यासाठी दिखावा केल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. अमित शहांनी घेतलेलं भोजन आदिवासी कुटुंबांनी बनवलेलं नव्हतंच तर मंत्र्यांसाठी बाहेरून जेवण मागविण्यात आलं होतं, असंही बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.