आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करणे झाले आवश्यक

November 26,2020

नागपूर : २६ नोव्हेंबर - देशासह राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकार कडून खबरदारी म्हणून बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरही बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली जात आहे. यात आरटीपीसीआर चाचणी अहवाल तपासला जात आहे. शिवाय तो अहवाल नसेल तर राज्य सरकारच्या टीमकडून रेल्वे स्थानकावरच आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यानंतरच पुढे प्रवेश दिला जात असल्याचे पहायला मिळत आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणीचा अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना प्रवास करण्यात अडचण येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार कडून देखील बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी करत कोरोना अहवाल तपासल्या जात आहे. शिवाय आरटीपीसीआर चाचणी देखील करण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर या चौकशीसाठी राज्य सरकार व रेल्वे विभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटण्यास प्रशासनाला मदत होत आहे. तसेच या पथकाकडून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाते. त्यानंतर थर्मल स्क्रिनिंगमध्ये तापमान व्यवस्थित असेल तर पुढे प्रवेश दिला जातो आहे. शिवाय प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल असेल तर फक्त थर्मल स्क्रिनिंग करून प्रवेश सोडण्यात येत आहे.

या प्रक्रियेला सुरुवात होताच जवळजवळ ८०० प्रवाशांचे आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. शिवाय यात एकही प्रवाशी पॉझिटिव्ह नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांडून सांगण्यात आले. मात्र, खबरदारी म्हणून रेल्वे विभाग व राज्य सरकारच्या टीमकडून ही मोहीम जोरात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर राजस्थान, गोवा, हरियाणा यासह इतरही राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच नागपुरातील वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या यामुळे या चौकशीचा फायदा प्रशासनाला होणार असल्याचे दिसून येत आहे.