अजित पवार पुण्याचे असल्याने विदर्भावर अन्याय करतात - चंद्रशेखर बावनकुळे

November 26,2020

गडचिरोली : २६ नोव्हेंबर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईचे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे असल्याने विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीत केला आहे.

नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणं, आपत्ती निधीत दुजाभाव यावरून हे स्पष्ट झालं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. विदर्भातील जिल्ह्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी देखील ठाकरे सरकारनं रोखला आहे, असा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केली आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोलीत आले होते. यावेळी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा विदर्भ दौरा अद्यापही झालेला नाही. विशेष म्हणजे असं पहिल्यांदा होत आहे. नागपूर अधिवेशन रद्द करणे, वैधानिक विकास महामंडळ गुंडाळणे, आपत्ती निधीत विदर्भावर दुजाभाव यावरून मुंबई, पुण्याची मंडळी विदर्भावर अन्याय करत असल्याचं स्पष्ट झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

विदर्भातील जिल्ह्यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेला निधी देखील उद्धव ठाकरे सरकारनं रोखल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हे विदर्भावर अन्याय करणारे सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.