अण्णा हजारेंच्या मागण्यांवर केंद्र सरकार उच्चधिकार समिती नेमणार

January 28,2021

अहमदनगर : २८ जानेवारी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्यांसंबंधी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत येऊन हा प्रस्ताव हजारे यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावाचा अभ्यास करून भूमिका जाहीर करण्यासाठी हजारे यांनीही तिघांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती अभ्यास करून हजारे यांना केंद्र सरकारच्या प्रस्तावाबद्दल तपशील आणि मत सादर करणार असून त्यानंतर हजारे आंदोलानासंबंधी आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. तूर्त तरी सरकारच्या प्रस्तावावर काहीही निर्णय झाला नसल्याचे हजारे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

माजी मंत्री महाजन गुरुवारी सकाळी हा प्रस्ताव घेऊन हजारे यांना भेटले. या समितीत अण्णा किंवा त्यांनी सुचविलेल्या व्यक्तीलाही घेण्याची सरकारची तयारी आहे. समितीसाठी हजारे यांनी नावे सुचवावीत अशी विनंती केली. या मुद्द्यावर कृषिमंत्र्यांशी हजारे यांचे बोलणे करून देण्याची तयारीही दर्शविली. मागील आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी हजारे यांचे म्हणणे केंद्र सरकारला कळविले होते. त्यावर काल दिल्लीत कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हजारे यांनी केलेल्या मागण्या म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, हमीभावासंबंधी कृषिमूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे यासंबंधी एक उच्चाधिकारी समिती नियुक्त करण्याची तयारी सरकारने दाखविली. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. त्यामध्ये स्वत: हजारे किंवा त्यांनी सुचविलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल, हा प्रस्ताव घेऊन महाजन आज सकाळी राळेगणसिद्धीमध्ये आले होते.

मात्र, हजारे यांनी यावर तूर्त काहीही भाष्य न करता या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी हजारे यांनी तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये दिल्लीतील एक आणि महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. एक कृषी शास्त्रज्ञ, एक कायदेतज्ज्ञ आणि हजारे यांच्या कार्यालयातील सहकारी अशा तिघांची समिती तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावाचा ही समिती आज दुपारपर्यंत अभ्यास करणार आहे. त्यावर काय भूमिका घ्यावी, काय दुरुस्ती करावी याबद्दल हजारे यांना माहिती दिली जाईल. त्यानंतर हजारे दुपारी केंद्र सरकारच्या प्रस्तावाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

हजारे यांच्याशी भेट झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, ‘हजारे यांनी केलेल्या मागण्यांसंबंधी उच्चाधिकार समिती नियुक्ती करून त्यांच्या मार्फत निर्णय घ्यावेत, अशी सूचना पुढे आली होती. त्यानुसार आम्ही काल दिल्लीला जाऊन कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये झालेल्या निर्णयाचे प्रारूप हजारे यांच्यासमोर ठेवण्यात आले. हजारे यांनी केलेल्या मागण्या आता मान्य होत आहेत, त्यांचे यावर समाधान होईल अशी अपेक्षा आहे. आता हजारे यांचे उत्तर आले की, निर्णयाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. तो हजारे यांना नक्कीच मान्य होऊन त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,’ असा आम्हाला विश्वास आहे.