दुसऱ्यांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नको - उदयनराजे भोसले

January 28,2021

सातारा : २८ जानेवारी - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले  आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले  आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी 'मराठा समाजाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही', असं उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यात अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचं उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजेंनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

'या कार्यक्रमाला आमचे खास बंधू' असं म्हणत उदयनराजे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.   मराठा मोर्चे आतापर्यंत अत्यंत शांतपणे निघाले आहे. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाला वेगळी वागणूक देणे हे योग्य नाही. आम्हाला दुसऱ्याच आरक्षण काडून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही. जसं त्या समाजाला आरक्षण देण्यात आले, तसे आम्हालाही देण्यात यावे. आमच्यावरच अन्याय का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत केला.

निवडणुका आणि सत्ता या दर पाचवर्षांनी येत असतात आणि जात असतात. पण ही लोकं तुम्हाला साथ देण्यासाठी असता. त्यामुळे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठीशी राहिले पाहिजे.  आज आरक्षणावरून वादळ सुरू असताना सुप्रीम कोर्टात वकील वेळेवर हजर राहत नाहीत. हे जाणूनबुजून केले जात आहे, असा आरोपही उदयनराजे यांनी केला.

'लोकांच्या भावना समजून घ्या, लोकांचा अंत पाहून नका, एकदा का उद्रेक झाला तर कोणी रोखणार नाही. मी तरी काय सांगणार आहे.आपल्या कुटुंबासाठी ही लोकं रस्त्यावर उतरली आहे', असा इशाराही उदयनराजेंनी दिली.

'आता कुठे तरी राजकारण थांबले पाहिजे. लोकांसाठी आणि समाजासाठी एकत्र आले पाहिजे. थोडी तरी जणाची नाहीतरी मनाची लाज बाळगूण काम केले पाहिजे, राजकारणाच्या नादात गजकरण झाले आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

तर शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.  'मुद्दामहून मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचे काम राज्यात होत आहे. कोपर्डी सारखी घटना पुन्हा व्हायची वाट पाहणार का? असा संतप्त सवाल शिवेंद्रराजेंनी विचारला.

खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला पाहिजे. कोणीही टीका केल्या तरी मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं आहे, असंही  शिवेंद्रराजे म्हणाले.

मराठा आरक्षण टिकण्यासाठी समाजाने सरकारवर दबाव टाकला पाहिजे. राजकारण विरहित संघटना मराठा आरक्षणावर लढण्यासाठी  निर्माण केली पाहिजे, अशी भावनाही शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली.