मजुराच्या अपघाती मृत्यूप्रकरणी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा - हंसराज अहिर यांची मागणी
February 24,2021चंद्रपूर : २४ फेब्रुवारी - ताडाळी एमआयडीसी येथील सिद्धबली इस्पात मर्यादित उद्योगात मध्यप्रदेशातील निवासी कामगार शैलेंद्र नामदेव याचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असून, कामगाराचे मृत शरीर परस्पर नागपूरला हलविले. याचेे बिंग फुटल्यानंतर उद्योगाने पोलिस विभागाला कामगार जखमी झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला असून, उद्योग मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत मोका चौकशी करण्यासाठी हंसराज अहीर यांनी थेट सिद्धबली इस्पात येथील घटनास्थळ गाठले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर, पोलिस निरीक्षक कासार, येरुरचे सरपंच मनोज आमटे, सोनेगाव सरपंच संजय उकीनकर, पडोली ग्राम पंचायत सदस्य विक्की लाडसे, सिद्धबली इस्पातचे अधिकारी उपस्थित होते. कामगाराचा मृत झाल्यानंतरही पोलिस विभागाला याची माहिती न देता त्याचे मृत शरीर जागेवरून हलविणे हा एक प्रकारे अक्षम्य गुन्हा आहे. हे प्रकरण दाबून मृत कामगाराच्या आश्रितांना मोबदला न देण्याच्या क्रूर मानसिकतेतून हा सर्व प्रकार उद्योगाच्या मालकाकडून करण्यात आल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी केला आहे. उद्योग व्यवस्थापनाच्या मते, तो कामगार जर जखमी होता. तर, त्याला लगेच चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा का दिली नाही आणि जर का तो जागीच मृत झाला तर त्याचे मृत शरीर उद्योग व्यवस्थापनाने का हलवले, या मुद्यावरून अहिर यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे. उद्योग व्यवस्थापनापुढे मानवी जीवनाची काहीही किंमत नसून, त्यांना आपला स्वार्थ या कामगारांकडून सिद्ध करायचा असतो आणि अशा मानसिकतेचा निषेध करीत असल्याचेही अहीर म्हणाले.
उद्योगात साधे सुरक्षा अधिकारीसुद्धा नसून, मृतक कामगार व इतर कामगार कर्मचार्यांना हेल्मेट, सुरक्षा जोडे सुद्धा नाही, अशी हुकूमशाही परिस्थिती या उद्योगात आहे. या प्रकरणाची आपण तक्रार करणार असल्याची माहिती अहीर यांनी दिली. सिद्धबली इस्पातचे व्यवस्थापनात बदल झाला. मात्र, या उद्योगातही पूर्वीच्या कामगारांच्या हातचे काम या व्यवस्थापनाने हिसकावले. या सर्व कामगारांना पूर्ववत कामगारांना न्याय देत काम देण्याचा इशाराही हंसराज अहीर यांनी यावेळी उपस्थित अधिकार्यांच्या माध्यमातून संचालकांना दिला.
उद्योगाच्या माध्यमातून होणार्या प्रदूषणामुळे नजीकच्या गावांना फटका बसला. शेतकर्यांची शेती व गावकरी बाधित होत असतानाही येथे या गावातील अथवा स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात येत नाही. या उद्योगात मागे झालेल्या अपघातात मृत व काल झालेला मृत्यू हे सर्व परप्रांतीय असल्याने स्थानिकांचा रोजगार डावलल्याचे चित्र यावेळी स्पष्ट झाले. त्वरित स्थानिकांना रोजगार देण्याच्या सूचना यावेळी अहीर यांनी केल्या. मृतक कामगाराच्या परिवाराला तात्काळ आर्थिक सहायता देत एकाला त्वरित रोजगार द्यावा, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, परप्रांतीय लोकांना रोजगार देताना त्यांचे पोलिस सत्यापन प्रमाणपत्र क्षेत्राच्या ठाण्यात जमा करावे, प्रदूषणाचा फटका नजीकच्या गावकर्यांना बसू नये, याकरिता नियमावलीचे पालन करावे, अशा सर्व सूचनाही हंसराज अहीर यांनी केल्या.