म्हणून मोदींनी आपल्या हयातीतच आपले नाव स्टेडिअमला दिले - प्रकाश आंबेडकर यांचा टोला

February 25,2021

मुंबई : २५ फेब्रुवारी - जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या ‘सरदार पटेल स्टेडिअम’चे बुधवारी ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असं नामकरण करण्यात आलं. १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्येची क्षमता असणाऱ्या या भव्य स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते. दरम्यान स्टेडिअमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला असून जोरदार टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की, मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”.

दरम्यान उद्घाटनावेळी अमित शाह यांनी हा मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यानेच देशाचे पंतप्रधान म्हणून स्टेडिअमला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगितलं. स्टेडिअममध्ये अणसाऱ्या दोन एण्डपैकी एकाचे नाव ”अदानी एण्ड’ आणि दुसऱ्याचं नाव ‘रिलायन्स एण्ड’ असं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरन मोदी सरकारवर निशाणा साधत ‘हम दो हमारे दो’ धोरण उघड झाल्याचा टोला लगावला आहे.