वऱ्हाडाचा टेम्पो उलटून ५ जण जागीच ठार तर २० जण जखमी

February 25,2021

चंद्रपूर : २५ फेब्रुवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. वऱ्हाडाचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाली आहे.

जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ ही घटना घडली आहे. रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे हे वऱ्हाड जात होते. कच्चेपार गावाजवळ वऱ्हाड पोहोचल्यानंतर अचानक टेम्पो चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. काही कळायच्या आता टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोच्या खाली काही जण दबले गेले होते, त्यामुळे त्यांनी जागेवर जीव सोडला. 

या अपघातात ५ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये वाहन चालकासह 2 पुरुष 2 महिलांचा समावेश आहे. सुमारे 20 वऱ्हाडी अपघातात जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले आहे.

लग्नाचे मंगलकार्य आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रत्नापूर येथून विवाह आटोपून वऱ्हाड एकारा येथे जात होते. स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रुग्णालयात दाखल केले आहे. साहिल कोराम (वय -14) रघुनाथ कोराम (वय - 41) कविता संजय बोरकर (वय - 35) वीणा घनश्याम गहाणे (वय -26) वैभव लोमेश सहारे (वय-30) अशी मृतांची नावे आहेत.