पश्चिम बंगालमध्ये ममताराज कायम राहणार एक्सिट पोलचा अंदाज

February 28,2021

नवी दिल्ली : २८ फेब्रुवारी - पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्या ओपिनियन पोलचे अंदाज हाती आले असून पश्चिम बंगालमध्ये 'ममताराज' कायम राहणार अशी शक्यता यात वर्तवण्यात आली आहे. या अंदाजांनुसार निकाल लागल्यास पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी आपली 'पॉवर' लावणाऱ्या भाजपला खूप मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, आसाम भाजप राखेल, पुदुच्चेरीत कमळ फुलेल, तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांची जादू दिसेल तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता राहील, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे. 

पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असं भाजपचं केंद्रीय नेतृत्व मैदानात उतरलेलं आहे. निवडणुका आता जाहीर झाल्या असल्या तरी पश्चिम बंगालमध्ये आधीपासूनच तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यातील घमासान सुरू झालेले आहे. ममता बॅनर्जी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने आपली सारी पॉवर ओतली आहे. ममता यांच्या पक्षातील अनेक बडे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. असे असताना या प्रतिष्ठेच्या लढाईत केंद्रात सत्ता असलेला भाजप नव्हे तर ममता बाजी मारतील, असे एबीपी न्यूज आणि सी-व्होटरची जनमत चाचणी सांगत आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयाची हॅट्ट्रिक साधतील. विधानसभेच्या २९४ जागांपैकी १४८ ते १६४ जागा ममता यांच्या तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात जातील. गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ ३ जागा जिंकणारा भाजप यावेळी मुसंडी मारून ९२ ते १०८ जागा जिंकेल. तर डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळतील, असा अंदाज  जनमत चाचणीत बांधण्यात आला आहे. तृणमूलला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के तर डावे-काँग्रेस आघाडीला १३ टक्के मते मिळतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांना पसंती दिली आहे, भाजपचे दिलीप घोष यांना २५ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे तर मुकुल रॉय हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य आहेत असे ९ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

आसाममध्ये पुन्हा भाजप: १२६ सदस्यसंख्या असलेल्या आसाम विधानसभेत पुन्हा भाजपचाच डंका राहील असा अंदाज आहे. भाजपला येथे ६८ ते ७६ जागा मिळू शकतात तर काँग्रेस ४३ ते ५१ जागांपर्यंत मजल मारेल आणि अन्य पक्षांच्या खात्यात ५ ते १० जागा जातील अशी शक्यता आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सर्वानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री आहेत.

तामिळनाडूत स्टॅलिन सरकार: तामिळनाडूत सत्तांतर होईल व स्टॅलिन यांचे सरकार येईल, असा अंदाज आहे. सत्ताधारी अण्णा द्रमुक-भाजप आघाडीचा मोठा पराभव होईल. २३४ पैकी ५८ ते ६६ जागांवर या आघाडीला समाधान मानावे लागेल तर स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक-काँग्रेस आघाडीला १५४ ते १६२ जागांसह निर्विवाद कौल मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

केरळमध्ये पुन्हा डावे डाव जिंकणार: केरळमध्ये सध्या डाव्या आघाडीचे सरकार असून आपला गड राखण्यात डावे पुन्हा यशस्वी ठरतील, असे दिसत आहे. विधानसभेच्या १४० जागांपैकी सत्ताधारी लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंटला ८३ ते ९१ जागा मिळतील, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला ४७ ते ५५ जागा मिळतील तर भाजपच्या हाती फारसं यश लागणार नाही. त्यांना जास्तीत जास्त दोन जागा मिळतील, असा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे.

पुदुच्चेरीत प्रथमच फुलणार कमळ?: तीस सदस्यसंख्या असलेल्या पुदुच्चेरी विधानसभेत भाजप प्रथमच बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. भाजपला १७ ते २१ जागा मिळतील, काँग्रेसला ८ ते १२ जागांवर समाधान मानावे लागेल तर अन्य पक्षांच्या खात्यात १ ते ३ जागा जातील असा अंदाज आहे. पुदुच्चेरीत याच आठवड्यात काँग्रेसचं नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात येऊन पायउतार झालं आहे. तिथे सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.