रायपूरच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३२२९ जोडपी विवाहबद्ध

March 01,2021

रायपूर : १ मार्च - रायपूर येथील स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात 3229 जोडपे विवाह बंधनात अडकले आहेत. हा विवाह सोहळा मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत आयोजित करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येनं पार पडलेला हा विवाह सोहळा अनोखा ठरला आहे. कारण एकाच वेळी 3229 जोडप्याचं विवाह पार पडल्याने हा जागतिक विक्रम ठरला आहे.

हा विवाह सोहळा अनोखा असण्याचं दुसरं एक कारण म्हणजे, या विवाह सोहळ्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वच धर्माचे लोकं होते. त्यामुळे जाती-धर्माच्या सर्व मर्यादा ओलांडत भारतीय एकतेचा संदेश देणारा हा अनोखा विवाह सोहळा ठरला आहे. हा विवाह सोहळा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीनं पार पडला आहे. या भव्य दिव्य विवाह सोहळ्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी उपस्थित जोडप्याला 7 ऐवजी 8 वचनं दिली.

खरं तर कोणत्याही लक्षात नवं वधू-वरांकडून सात वचनं घेतली जातात, पण मुख्यमंत्री बघेल यांनी या जोडप्यांकडून आठवं वचन घेतलं आहे. यावेळी भूपेश बघेल म्हणाले की, 'मी विशेषतः नवऱ्या मुलांकडून सुपोषणाचं आठवं वचन घेत आहे की, तुम्ही आपली पत्नी आणि संपूर्ण परिवाराची योग्य काळजी घ्यालं. कारण महिला सुपोषित राहिल्या तरच जन्म घेणारी लेकरंही सुपोषित राहतील. यामुळे आपण खऱ्या अर्थाने कुपोषनाशी लढा देवू शकतो. यामुळे छत्तीसगड हे एक सदृढ राज्य बनेल.'

 छत्तीसगडची राजधानी रायपूर याठिकाणी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात 3 ख्रिश्चन, 1 मुस्लीम आणि 236 हिंदू जोडप्यांनी लग्न केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि महिला बाल विकास मंत्र्यांनी सर्व जोडप्यांना लग्न प्रमाणपत्राचं वाटप केलं. यावेळी 2195 जोडप्यांनी ऑनलाइन पद्धतीने या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्री कन्या विवाह सोहळ्यांतर्गत शनिवारी एकूण 3229 जोडप्याचा विवाह पार पडल्याने 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं की, मोठ्या संख्येनं युवक सामुहिक विवाह सोहळ्याचा पर्याय निवडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा वायफळ खर्च वाचत आहे. यावर्षी छत्तीसगडमध्ये 7 हजार 600 विवाह पार पाडण्यातं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. शिवाय मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत संबंधित नवं जोडप्याला 15 हजार रुपयांची मदत केली  जाते. पण छत्तीसगड सरकारने ही मर्यादा वाढवली असून येथून पुढे 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.