गतवर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात - न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

March 01,2021

नवी दिल्ली : १ मार्च - मुंबईमध्ये मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दशकांमधील सर्वात मोठा विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार म्हणून ज्या घटनेकडे पाहिजे जाते त्या घटनेची थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने याच भारत चीन संघर्षाच्या काळात मालवेअर इंजेक्ट केला. विशेष म्हणजे द न्यू यॉर्क टाइम्सने हा दावा आता केला असला तरी यापूर्वीही चिनी हॅकर्सचा मुंबईला काळोखात लोटण्यात हात होता अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तामध्ये महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये अनेक तास वीज नव्हती. सकाळी दहा वाजल्यापासून पुढील अनेक तास अनेक ठिकाणी वीजपुरठवा सुरळीत झाला नव्हता. काही ठिकाणी तर बारा तास उलटल्यानंतरही वीज नव्हती. हा वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेच्या लोकसेवेपासून इतर अनेक सेवांना मोठा फटका बसला होता.

द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी होऊनही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवणारा प्रकार घडला. मात्र या मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही विृत्तात म्हटलं आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्तात म्हटलं आहे.

चिनी सरकार पुरस्कृत रेडइको नावाच्या कंपनीने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी असणाऱ्या स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली.

हा घातपाताचाच प्रकार - ऊर्जामंत्र्यांचा दावा 

  दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 'तो घातपातच होता', असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. 

 'राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. राज्य वीज नियामक आयोग (MERC) व केंद्रीय वीज प्राधिकरणानंही समिती स्थापन केली होती. सायबर सेललाही तक्रार करण्यात आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आज तो अहवाल ऊर्जा विभागाला देणार असून त्याबाबत सविस्तर निवदेनही केलं जाईल' असं राऊत यांनी सांगितलं.