उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी - अतुल भातखळकर यांची टीका

March 04,2021

मुंबई : ४ मार्च - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असा टोला लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचं हे विधान भारतीय सैन्यांचं अपमान करणारं असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.

भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राहुल गांधींवरही निशाणा साधला अशून उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “चीनसमोर पळ काढे असं निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”.

जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच” असंही ते म्हणाले आहेत.