पेगॅससवरून राहुल गांधी आक्रमक

July 28,2021

नवी दिल्ली : २८ जुलै - देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता आहे. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. पेगॅससवर संसदेत कोणतीही चर्चा होणार नाही, असं सरकारनं आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे. सरकारने पेगॅसस विकत घेतलं की नाही?, असा आमचा प्रश्न आहे. सरकारने आपल्या लोकांविरोधात पेगॅससचा वापर केला की नाही? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, तुमच्या फोनमध्ये नरेंद्र मोदी यांनी अँप टाकलं आहे. माझ्या विरोधात त्याचा वापर केला गेला. सुप्रीम कोर्टाविरोधात या हत्याराचा वापर केला गेला. बाकी नेत्यांच्या विरोधात याचा वापर केला. त्यामुळे संसदेत याबद्दल चर्चा का होत नाही?. आमच्याबद्दल सांगितलं जातं की आम्ही संसदेच्या कामात अडथळा आणत आहोत. पण, आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. पेगॅससचा वापर देशाविरोधात केला गेला आहे. याचा वापर दहशतवाद्यांविरोधात केला पाहिजे. मात्र, याचा वापर आमच्या विरोधात का केला?, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, पेगॅसस मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेगॅससच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ झाला. यावेळी विरोधकांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप केला. पावसाळी अधिवेशनाचा आठव्या दिवशीही गोंधळाचं वातावरण होतं. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्याप्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले. पेगॅसस मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे.