“विस्ताराचा पाळणा हलायला…”, ठाकरे गटाचा सत्ताताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले “सगळाच वांझ कारभार…”

June 07,2023

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताचारी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आलाय. ठाकरे गटातील नेते मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर, शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, तरीही राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला. तसंच, राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

सरकारची अब्रू चव्हाट्यावर

मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये’गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ असाच सुरू आहे . डबल इंजिनवाल्या सरकारची ही अधोगती आहे. सरकारची गती व मती हा अभ्यासाचा विषय आहे. या सरकारची अब्रू रोज चव्हाट्यार पडते आहे. तेव्हा कोणत्या गतीच्या गोष्टी करता? मुंबईसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमायला एवढा उशीर केला. आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिकांना महापौर कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर द्या!, असं ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

डबल इंजिन सरकारला तेलपाणी करण्यास दिल्ली सर्व्हिंसिंग स्टेशनला जावं लागतं

महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत असतात. आपले सरकार ‘डबल इंजिन’वाले आहे असे ते म्हणतात. पण इंजिनास ‘तेलपाणी’ करण्यासाठी त्यांना वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावे लागते. यालाच जर हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय बोलायचे? सत्य असे आहे की, तथाकथित गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी आहे, अशीही टीका यातून करण्यात आली आहे.

नऊ महिने गेले तरी…

“वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली.

सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे

“डबल इंजिन’वाल्या सरकारची कमाल कशी ती पहा. गेल्या दोनेक वर्षांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरीस महापौर नाही. मुंबई नगरी महापौरविना उघडीबोडकी आहे. महापौर नाही, महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. मंत्रालयातून त्यांना हवा तसा कारभार हाकला जात आहे. बरे, महापौर व निवडणुका का नाहीत? तर निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच महापौर होईल या भयाने गतिमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे. भारतीय जनता पक्षाची बदके अधूनमधून आमचाच महापौर असे सांगत आहेत. त्यावर गतिमान मिंधे गट बोलायला तयार नाही”, असेही टीकास्त्र करण्यात आले आहे.