भविष्यात डिजिटल माध्यमातून साहित्य प्रकाशित होणे स्वागतार्ह - नितीन गडकरी

August 01,2020

नागपूर : १ ऑगस्ट - २१ वे शतक हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. डिजिटल माध्यमात आता साहित्यही उपलब्ध होऊ लागले आहे. अशा वेळी मराठी पत्रकार आणि लेखकांनी मुद्रित माध्यमाच्या मागे न लागता  आपले साहित्य डिजिटल माध्यमातून  वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह ठरतो असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलवाहतूक व जहाजबांधणी, लघु व मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

नागपुरातील जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक तसेच नागपूर इन्फोचे संपादकीय सल्लागार  अविनाश पाठक लिखित थोडं  आंबट थोडं  गोड या ललित लेख संग्रहाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन आज नितीन गडकरी यांचे हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात झाले, त्यावेळी गडकरी  बोलत होते.  यावेळी लेखक अविनाश पाठक, अनुरूपा पाठक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, माजी राज्यसभा सदस्य आणि मध्य भारतातील आघाडीचे उद्योगपती अजय संचेती  प्रभृती उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी अविनाश पाठक यांच्या वाङ्मयीन वाटचालीचे कौतुक करीत त्यांना अधिकाधिक लेखन करावे आणि दर्जेदार साहित्य वाचकांना द्यावे यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकार समाजात उघड्या डोळ्यांनी वास्तव बघत आणि अनुभवत असतात, त्यामुळे असे पत्रकारांनी केलेले लेखन हे अधिक वास्तववादी ठरते असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

यावेळी गडकरी यांनी डिजिटल आवृत्तीचे   प्रकाशन केले आणि मुद्रित प्रतीचेही अनावरण केले. प्रारंभी अविनाश पाठक यांनी शाल व श्रीफळ देऊन गडकरी यांचे स्वागत केले. योगायोग असा की अविनाश पाठक लिखित पहिले पुस्तक दाहक वास्तव च्या प्रकाशन समारंभालाही नितीनजी गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याची आठवण देत  आता ११ व्या पुस्तकांचेही प्रकाशन गडकरींच्याच हस्ते होत असल्याचे अविनाश पाठक यांनी आवर्जून नमूद केले.

 थोडं आंबट थोडं गोड हे पुस्तक अविनाश पाठक यांनी दै. श्रमिक एकजूट नांदेडमध्ये चालवलेल्या उचलली पेन अन्... या स्तंभातील आणि दै. गावकरी नाशिकमध्ये चालवलेल्या संत्रा बर्फी या स्तंभातील निवडक लेखांचा संग्रह असून यात 38 लेखांचा समावेश आहे. यात 16 व्यक्तिंची व्यक्तीचित्रे किंवा आठवणी सांगणारे लेख समाविष्ट असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कांचन गडकरी, डॉ. द.भि. कुळकर्णी, मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. विनय वाईकर, वामनराव चोरघडे, पी.आर. जोशी, विनयकुमार काटे, विकास आणि प्रकाश आमटे, आकाशानंद, स्मिता तळवलकर आणि एकनाथ ठाकूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे अशा मान्यवरांवरील लेखांचा समावेश आहे. याशिवाय विविध सामाजिक विषयांनाही हात घालणारे लेख या पुस्तकात असून त्यात वृद्धाश्रम आणि बोर्डिंग, लहान वयातला चष्मा, सुजाण  पालककत्व, कांद्याचे वाढलेले भाव अशा विषयांवर राजकारण न आणता ललित अंगाने हे विषय या लेखांमध्ये मांडलेले आहेत. या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे भूतपूर्व  अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. तर दिवंगत थोर साहित्यिक श्रीमती गिरिजा कीर यांच्या स्मृतिला हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे.

अविनाश पाठक यांचे प्रकाशित होत असलेले हे 11 वे पुस्तक आहे. या आधी त्यांनी लिहिलेले दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, कालप्रवाहाच्या वळणांवरून हे तीन वैचारिक लेखांचे संग्रह, गाभाऱ्यातला   कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश आणि आठवणीतले नेते हे ललित लेखांचे संग्रह, पूर्णांक सुखाचा ही लघु कादंबरी, डावपेच हा राजकीय कथांचा संग्रह, मराठी वाड्मय व्यवहार-चिंतन आणि चिंता हा संपादित ग्रंथ आणि काळ्या कोळशाची काळी कहाणी हा कोळसा घोटाळ्याची चिरफाड करणारा ग्रंथ यांचा समावेश आहे. यातील मराठी वाड्मय व्यवहार- चिंतन आणि चिंता हा ग्रंथ महाराष्ट्र शासन आणि रसिकराज नागपूरच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. तर पूर्णांक सुखाचा या कादंबरीला पद्मगंधा प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डावपेच या कथासंग्रहाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार देण्यात आला असून रसिकराज नागपूरच्या पुरस्कारानेही या कथासंग्रहाला गौरविण्यात आले आहे. आठवणीतले नेते या पुस्तकालाही साहित्य विहार या संस्थेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
‘थोडं आंबट थोडं गोड’ हे अविनाश पाठक लिखित पुस्तक अँमेझॉन  किंडलवर https://www.amazon.in/dp/BO8DR5JY1R/ref=cm_sw_r_wa_awdb_t1_EZfiFb4A7RZ4K  या लिंकवर क्लिक करून उपलब्ध होऊ शकेल.